March 2025

आम्ही जातो आपुल्या गावा – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

वैकुंठ हे भगवान विष्णूंचे म्हणजेच परमेश्वर श्रीकृष्णांचे आध्यात्मिक स्थान किंवा निवासस्थान आहे. हे असे स्थान आहे जिथे जीव शाश्वत आनंद अनुभवतो. याउलट, भौतिक जगात, जिथे सध्या आपण आहोत, तिथे जीवाला जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधीच्या चक्रात अडकून राहावे लागते

हुशार व्यक्तीला भौतिक जगाबद्दल आणि स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. जर तुम्ही ती हुशार व्यक्ती असाल आणि तुम्हाला या न संपणाऱ्या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रातून सहज, सोप्या मार्गाने मुक्ती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा

आज आपण संत तुकाराम महाराजांचा तो अभंग पाहणार आहोत, जिथे महाराजांनी वैकुंठप्राप्तीचा सहज सोपा मार्ग सांगितला आहे. हा अभंग त्या वेळेचा आहे, जेव्हा तुकाराम महाराज स्वतः वैकुंठास गमन किंवा प्रस्थान करतात.

आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥

तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जीवाचे मूळ स्थान कोणते आहे, याबद्दल माहिती देतात. ते या भौतिक जगाला — म्हणजेच जिथे आपण सध्या राहत आहोत त्यास — स्वतःचे गाव किंवा जन्मस्थान मानत नाहीत. या चरणात महाराज सूचित करतात की आपले मूळ जन्मस्थान वेगळे आहे.

या शाश्वत स्थानाबद्दल स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या १८व्या अध्यायाच्या ५६व्या श्लोकात माहिती देतात:

Bg. 18.56

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्‍व्यपाश्रय: ।
मत्प्रसादादवाप्‍नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६ ॥

“भगवान श्रीकृष्ण म्हणतात: माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला, तरी माझ्या आश्रयाखाली, 
माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते.”

येथे ‘शाश्वत अविनाशी धाम’ म्हणजेच वैकुंठ होय.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात की ते वैकुंठास गमन करत आहेत. वैकुंठास प्रस्थान करत असताना ते सांगतात की एकदा का वैकुंठाची प्राप्ती झाली, की आपली या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीपासून सुटका होते.  “येथुनियां जन्मतुटी” चा अर्थ हाच आहे.

तुकाराम महाराज आपल्या विशुद्ध भक्तीमुळे आणि अभंगांमुळे खूप लोकप्रिय झाले होते. अशा थोर संताचा आपल्यापासून वियोग न व्हावा, असे त्यांच्या अनुयायांना आणि भक्तांना नक्कीच वाटले असेल. त्यामुळे लोकांनी त्यांना वैकुंठास जाऊ नका, अशी विनंती केली असणार.

त्यांच्या या विनंतीला तुकाराम महाराज पुढीलप्रमाणे उत्तर देतात:

“मी तुमच्या पायी लागतो, माझ्यावर दया करा आणि मला या भौतिक जगात राहण्याची विनंती करू नका. याउलट, जर तुम्हाला निजधामी म्हणजेच आपल्या हक्काच्या घरी जायचे असेल, तर ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणा.”

तुकाराम महाराज पुढे सांगतात:

“राम आणि कृष्ण नाम असलेल्या मंत्राचा भक्तिभावाने उच्चार केल्यास मनुष्याला या भौतिक जगातून मुक्ती मिळते आणि भगवंताच्या शाश्वत धामाची प्राप्ती होते.”

तुकाराम महाराजांच्या शिकवणीतून आणि शास्त्रांच्या आधारावर आपल्याला एक मंत्र मिळतो, ज्याला शास्त्रात “महामंत्र” म्हटले जाते. तो मंत्र म्हणजे:

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।।


सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!


0

कन्या सासुर्‍यासि जाये – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

एखाद्या व्यक्ती कितीही साधना करत असेल, नानाविध यज्ञ करत असेल, पण जर ती व्यक्ती स्वतःचा भगवंतापासून दुरावा अनुभवत नाही तोपर्यंत त्यास खरा भक्त समजता येणार नाही. संत तुकाराम महाराज हे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठलाचे विशुद्ध भक्त होते, त्यांच्या काही अभंगात त्यांची भगवंतभेटीची असणारी तळमळ किंवा ओढ दिसून येते, आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यात संत तुकारामांचे भगवंतांप्रती असलेले उच्चकोटीचे प्रेम दिसून येते. 

कन्या सासुर्‍यासि जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा ।
केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये ।
बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी ।
तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥

संत तुकारामांच्या काळी म्हणजेच १७ व्या शतकात मुलींची लहान वयामध्येच लग्न होत असत, मुलगी ज्यावेळी लग्नानंतर सासरी जाण्यास निघते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते अशीच अवस्था संत तुकारामाची होत असे. तुकाराम महाराज म्हणतात – ज्याप्रमाणे एखादी मुलगी सासरला जाताना तिच्या मनात आपल्या कुटुंबाप्रती जी विरहाची भावना निर्माण होते तशीच भावना माझ्यातही निर्माण झाली आहे. हे विठ्ठला ! हे केशवा ! तू मला कधी भेटशील ते सांग. 

ज्याप्रमाणे एखाद छोट मुलं आई जेव्हा त्याच्या नजरेआड होते तेव्हा ते इतरत्र कावरेबावरे होऊन आईला शोधत असते, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची अवस्था हि त्या लहान बाळासारखे झाली जे आपल्या आईपासून कदापि वेगळे राहू शकत नाही. 

शेवटच्या चरणात संत तुकाराम म्हणतात – मासा पाण्याबाहेर येताच तो ज्याप्रकारे तळमळत असतो त्याचप्रमाणे माझीहि अवस्था झाली आहे. मी सुद्धा तळमळतो आहे कारण माझा प्राण माझ्या पांडुरंगाची मला भेट घडत नाहीये. 

विरहाची भावना ही भगवदप्रेमाच्या अधिक जवळ पोहोचवण्यास मदत करते. आध्यात्मिक जगतातच नव्हे तर भौतिक जीवनातही जेव्हा आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर होते तेव्हा त्या व्यक्ती प्रती आपले प्रेम वाढत जाते. 

चला तर हरिनाम घेऊन, हरीकीर्तन करून भगवंताप्रति प्रेम वाढवूया. 


सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!


0

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

संत तुकारामांनी हरिभक्ति आणि हरिनामाचे श्रेष्ठत्व याविषयी अनेक अभंग रचले आहेत, त्यातील एक अभंग आज आपण पाहणार आहोत.

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥

संत तुकाराम महाराज अत्यंत आदरपूर्वक आपणास विनवणी करतात की आपण अत्यंत आनंदाने व हर्षोल्लासाने हरिकीर्तन करावे हाताने टाळी वाजवत मुखी परमेश्वराचे नाम घ्यावे. महाराज म्हणतात – तुम्ही विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा म्हणा कारण हा सुख सोहळा स्वर्गलोकातील जीवांना सुद्धा उपभोगता येत नाही. जेव्हा मनुष्य पुण्य कर्म करतो त्यावेळेस त्यास स्वर्गप्राप्ती होते, स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश केल्यानंतर तो केलेल्या पूर्व कर्मामुळे सुख उपभोगत असतो. पण जीवाचे खरे शाश्वत सुख हे भौतिक वस्तू उपभोगण्यात नसून ते भक्ती मध्ये आहे; आणि भक्ती करण्यासाठी सर्वात सोपा सरळ मार्ग कोणता याबद्दल तुकाराम महाराज पुढील चरणात वर्णन करतात. 

कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥

तुकाराम महाराजांनी या चरणात भगवंताची काही नावे दिली आहेत वास्तविक भगवंताची सहस्त्र नावे आहेत आणि त्यांच्या कोणत्याही नामाचा उच्चार भक्तीभावाने केल्यास मनुष्य अध्यात्मिक उन्नतीकडे अग्रेसर होतो. तुकाराम महाराज म्हणतात – भगवंताच्या नामोच्चाराने मनुष्य प्रामाणिकपणे वैकुंठाकडे प्रस्थान करू शकतो. येथे आपण समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण फक्त पुण्य कर्म करतो तेव्हा आपण स्वर्ग लोकांत प्रवेश करतो पण जेव्हा आपल्या पुण्यकर्माचा संचय कमी होतो तेव्हा आपणास पुन्हा या भौतिक जगामध्ये प्रवेश करावा लागतो; पण वैकुंठ म्हणजे साक्षात श्रीकृष्णांचे धाम – जेथे भगवान श्रीकृष्ण नित्य निवास करतात ते स्थान आणि अशा या वैकुंठाची प्राप्ती जेव्हा एक जीव करतो तेव्हा तो भौतिक जगापासून आपली सुटका करवून घेतो. 

तुकाराम महाराज आपणास भक्ती मार्गाने वैकुंठाची प्राप्ती कशी करता येईल याबद्दल उपदेश करतात, पुढील चरणात महाराज म्हणतात – 

सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥

मनुष्य मग तो कोणत्याही वर्णाश्रमामध्ये असेल त्या सर्वांना भगवंतांचे पवित्र नाम घेण्याचा अधिकार आहे आणि असे पवित्र नाम घेतल्याने त्याचा उद्धार होतो श्रीमद्भागवत महापुराण मध्ये आलेल्या वर्णनाप्रमाणे ४ युगे आहेत आणि प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेतात. 

सत्ययुग – या युगाचा कालावधी १७ लाख २८ हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवान विष्णूंवर ध्यान करणे. 
त्रेतायुग – या युगाचा कालावधी  १२ लाख ९६ हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये यज्ञाच्या स्वरूपाने आत्मसाक्षात्कार होतो. 
द्वापरयुग – ह्या युगाचा कालावधी ८ लाख ६४ हजार वर्षे इतका आहे आणि ह्या युगामध्ये भगवंतांच्या मूर्ती पूजेद्वारे आत्मसाक्षात्कार होतो. 
कलियुग – आता आपण कलियुगामध्ये आहोत आणि या कलियुगाचा कालावधी ४ लाख ३२ हजार इतका वर्षे इतका आहे, ह्या कलियुगात जेथे अधर्म सर्वात जास्त आहे जेथे मनुष्य खूप आळशी आहे जेथे खूपच दुर्मिळ लोकांना भगवद्दामप्राप्ती होते; अशा या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवंतांच्या पवित्र अशा नामाचे उच्चारण. 
तुकाराम महाराज या चरणात हेच सांगतात की कलियुगामध्ये उद्धार हा हरिनामाने होतो. 

शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात –
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥

मुक्ती या ४ प्रकारच्या असतात – सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता आणि या चारही मुक्ती मनुष्य केवळ हरीच्या नामोच्चाराने प्राप्त करू शकतो. 


सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!


0

क्षणक्षणा हाची करावा विचार – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि याचा उपयोग करून आपण या भौतिक अशाश्वत जगातून शाश्वत अशा अध्यात्मिक लोकांत प्रवेश करू शकतो. 

संत तुकाराम महाराज म्हणतात – 

क्षणक्षणा हाची करावा विचार । तरावया पार भव सिंधु ।।१।।
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।२।।
संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची ।।३।।
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो ।।४।।

अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याने भवसिंधु म्हणजेच संसार रुपी सागरातून बाहेर पडण्याचा वेळोवेळी विचार केला पाहिजे कारण हा संसार किंवा मृत्यूलोक हा दुःख देणारा आहे आणि या भौतिक जगांत आपण जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रात अडकून राहतो. 

भगवद्गीता – अध्याय ८ श्लोक १५ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना या भौतिक जगाला “दु:खालयमशाश्वतम्” संबोधतात. 

मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्‍नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ॥

आपणास माहित आहे – जेथे पुस्तके मिळतात त्याला आपण पुस्तकालय म्हणतो, जेथे विद्या मिळते त्याला आपण विद्यालय मिळतो, त्याचप्रमाणे जेथे दुःख मिळते ते म्हणजे दुःखालय, आणि हे दुःखाचे घर असून सुद्धा शाश्वत नाही – अशाश्वतम.
विष्णू भगवान या भौतिक जगाची निर्मिती करतात तर शंकर भगवान या भौतिक जगाचा संहार करतात. 

अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज आपणास चेतवणी देतात की आपणांस मिळालेले शरीर हे नाशवंत आहे आणि कधी ना कधी ते आपण सोडणार आहोत. या देहाचे आयुष्य कमी करण्याचा प्रयत्न काळ किंवा वेळ करते आहे.  

तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज आपणास संतांचे संगतीत राहून परमार्थ किंवा आध्यत्मिक ज्ञान आत्मसात करण्याबद्दलचे उपदेश करतात. भौतिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपणास शिक्षकाची गरज असते, त्याचप्रमाणे उच्चतर आध्यत्मिक ज्ञान ग्रहण करण्यास मदत करणारे शिक्षक म्हणजे संत. या चरणात आलेला “तातडी” हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.

आपण समजतो की भक्ती करण्याचं अजून माझं वय नाही किंवा आपण भक्ती नंतर करू शकू. पण आपण समजून घेतलं पाहिजे की हे जीवन खूप छोट आहे आणि हे असं असतानाच ते अनिश्चित पण आहे. याचा अर्थ की आपण सांगू शकत नाही की आपण किती काळ जगू, हे एवढं साधे सत्य आपण विचारात घेत नाही. उद्याचा दिवस पाहू की नाही याची अनिच्चीतता असताना सुद्धा आपण पहाटेचा अलार्म लावून झोपतो. 

भगवद्गीता – अध्याय ८ श्लोक ५ मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात – 

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भ‍ावं याति नास्त्यत्र संशय: ॥

अंतकाळी म्हणजेच मरणाचे वेळी जो माझे स्मरण करीत देह त्याग करतो, तो भगवंतांचे नित्य धाम किंवा वैकुंठाची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही. 

पण अंतकाळी भगवंतांचे स्मरण होण्यासाठी जन्मभर आपणास त्याचा सराव करावा लागेल, हेच विचारात घेऊन तुकाराम महाराज परमार्थ हा तात्काळ करण्याचा विषय आहे हे सांगण्यावर भर देतात. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात इहलोक व्यवहार म्हणजे त्या गोष्टी ज्या भगवतभक्तीशी निगडित नाहीत त्याकडे लक्ष देऊन आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर होऊ देऊ नये. 

सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!


0

आतां तरी पुढें हाचि उपदेश – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि या मनुष्य जन्माचा उपयोग करून आपण शाश्वत भगवतधामाची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती करू शकतो. आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यामध्ये संत तुकाराम महाराज मनुष्य जन्माचा उपयोग भक्तीमध्ये कसा करावा किंवा या अनमोल आयुष्याचा नाश न करण्याबद्दलचे उपदेश करतात.  

महाराज पुढीलप्रमाणे उपदेश करतात – 

आतां तरी पुढें हाचि उपदेश ।
नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत ।
आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन ।
करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।
करा काय फार शिकवावें ॥३॥

हितोपदेशाच्या एका श्लोकात म्हटले आहे – 

आहार निद्रा भय मैथुनं च
सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:
धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥

आहार – शारीरिक भूक भागवण्यासाठी मनुष्य आहाराची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा आहाराची व्यवस्था करतात. 
निद्रा – शारीरिक व मानसिक थकवा घालवण्यासाठी मनुष्य निद्रा किंवा झोप घेतो त्याप्रमाणे प्राणी सुद्धा झोप घेतात. 
भय – मनुष्यात भय वाटते आणि भीतीपोटी तो वेगवेगळ्या साधनांचा वापर करून स्वतःचा बचाव करतो त्याचप्रमाणे भयावर नियंत्रण व आत्म संरक्षण हे प्राण्यातही आहे.  
मैथून – मनुष्य मुलांना जन्म देतो त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा पिल्लांना जन्म देतात. 

या सर्व गोष्टी मनुष्य आणि प्राण्यांत सारख्या आहेत, यामध्ये मनुष्याला भले चांगल्या सुविधा आहेत जसे – प्राणी जमिनीवर, झाडांवर मिळेल त्या जागी झोपतात तर मनुष्य मऊ गादीवर झोपत असेल, प्राण्यांकडे निवडक आहाराचे पर्याय आहेत तर मनुष्य चवी नुसार अन्न प्रश्न करतो. हे जरी असले तरी मूळ कार्यत् तर दोघांना सारखेचं आहेत.

धर्मपालन हा मनुष्य आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. धर्मपालन करून मनुष्य भगवंतांप्रती चौकशी करू शकतो जसे की – भगवंत कोण आहेत? आपण कोण आहोत? आपला व भगवंतांचा संबंध काय? आपण भगवंतप्राप्ती कसे करू शकतो? हे प्रश्न मनुष्याला पडतात व मनुष्य या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करू शकतो. 

तुकाराम महाराज अभंगातून हेच सांगतात की आपण मनुष्य जन्माचा नाश न करता म्हणजेच मनुष्यजन्म हा प्राण्यांप्रमाणे वाया न घालवता त्याचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी केला पाहिजे. पुढे तुकाराम महाराज विनवणी करतात की मनुष्याने आपले चित्त शुद्ध व मन भगवंतावर एकत्रित करून देवाचे चिंतन व नामोच्चारण केले पाहिजे. अभंगांमध्ये आलेल्या “व्यापार” या शब्दाचा अर्थ आहे “कार्य”. सफल व्यापार किंवा सफल कार्य तेच ज्यातून आपणास फायदा होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात भगवंतांप्रती केलेल्या कार्यातून आपल्याला लाभ होतो. 

सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!


0

आम्ही तेणे सुखी – छ. शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगांतून त्यांचे भगवंतांविषयी असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी त्यांच्या अभंगातून लोकांना समजेल अशा भाषेत अध्यात्म सोपं केलं. आपण हे एक शरीर नसून एक आत्मा आहोत आणि भगवंताची सेवा करणे हे आपले मूळ कर्तव्य आहे, असे त्यांनी शिकवले. मनुष्याने शरीराभोवतीच्या मोहात न अडकता या दुर्मिळ मानव जन्माचा उपयोग भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी केला पाहिजे, आणि हे साध्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण.

भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संन्यास आश्रम स्वीकारण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं की गृहस्थ असतानाही, गृहस्थाश्रमात राहून आपण भगवंताची उत्तम भक्ती करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजाला असे अनेक उपदेश दिले.

तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. एके दिवशी शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांसह संत तुकाराम महाराजांच्या घरी पोहोचले. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत मौल्यवान दागिने आणि वस्त्रे नेली होती. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले, “महाराज, तुमची ख्याती ऐकून तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही करत असलेल्या धर्मकार्याने मी खूप प्रभावित झालो आहे, आणि मी तुम्हाला यासाठी मदत करू इच्छितो. मी आणलेल्या धनाचा तुम्ही स्वीकार करावा.” असं म्हणत शिवाजी महाराज भक्तिभावाने संत तुकारामांच्या चरणी नतमस्तक झाले.

मुळात तुकाराम महाराजांना ऐश्वर्य आणि संपत्तीबद्दल आकर्षण नव्हते. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना या पुढील अभंगातून उपदेश करतात – 

आम्ही तेणें सुखी | म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ||१||
तुमचे येर वित्त धन | तें मज मृत्तिकेसमान ||धृ||
कंठीं मिरवा तुळसी | व्रत करा एकादशी ||३||
म्हणवा हरीचे दास | तुका म्हणे मज हे आस ||४||

महाराज म्हणतात – “अहो शिवराय, तुम्ही मला खुश करण्यासाठी आलेले आहात हे मला माहित आहे, पण माझं सुख हे धनात नाही. जर तुम्ही खरोखरच मला खुश करू इच्छित असाल, तर भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नाव घ्या, त्यातच आम्ही संतुष्ट होऊ. तुम्ही आणलेल्या मौल्यवान वस्त्रं आणि दागिन्यांची मला काही गरज नाही; ती आमच्यासाठी मातीसमान आहेत.”

तुकाराम महाराजांनी पुढे म्हटलं, “तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीमाळ धारण करा, आणि एकादशीचं व्रत पाळा. स्वतःला हरीचा दास म्हणून घ्या, हेच माझं तुमच्याकडे मागणं आहे.” तुकाराम महाराजांच्या या उपदेशाचा शिवाजी महाराजांवर खूप मोठा परिणाम झाला. पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी मांसाहाराचा त्याग केला आणि गळ्यात तुळशीमाळ धारण केली.

हा प्रसंग आपल्याला शिकवतो की, आपण कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित न होता आपल्या अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष दिलं पाहिजे. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संवादातून एकादशी व्रताचे महत्त्वही आपल्यासमोर येतं. उपवासाचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण आता अनेक वैज्ञानिक संशोधनात उपवासाचं शारीरिक महत्त्वही पुढे येत आहे.


सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!

 


0